महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,56,519

झुंज भाग ७

By Discover Maharashtra Views: 4192 14 Min Read

झुंज भाग ७ –

(झुंज – कथा रामशेजची)

खान आज खूपच खुशीत होता. लाकडी बुरुजाचे काम पूर्ण झाले होते. या बुरुजाची मजबुती कशी आहे हे खान जातीने लक्ष घालून पहात होता. इतक्या दिवसांच्या परिश्रमाचे त्याला मिळालेले हे फळ नक्कीच गोड होते. आता फक्त बुरुजावर तोफा चढवायच्या आणि जास्तीत जास्त चार दिवसात रामशेजवर चांदसितारा फडकवायचा याची त्याने मनाशी खुणगाठच जणू बांधली होती.

किल्लेदार मात्र मोठ्या काळजीत पडला होता. जो माणूस किल्ल्याच्या उंचीचा बुरुज आपल्या सैन्याकडून उभारून घेऊ शकतो तो किती चिवट असणार याची चांगलीच खात्री किल्लेदाराला आली होती. त्यामुळेच गडावर सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले होते. गडावरील लोकं जरी उघड उघड बोलून दाखवीत नव्हते तरी ते मनातून काहीसे हादरले होते. त्यातल्या त्यात एकच गोष्ट किमान अजून तरी समाधानकारक होती. ती म्हणजे इतके होऊनही किल्लेदार नाउमेद झालेला नव्हता. त्याच्या प्रत्येक सभेत, चर्चांमध्ये तो पहिल्या इतकाच उत्साही होता.

“आवो…! दोन घास खाऊन घ्या…!” किल्लेदाराला चिंतेत पाहून त्याच्या बायकोने म्हटले.

“आं… काई म्हनालीस?” किल्लेदार बायकोच्या आवाजाने काहीसे भानावर आला.

“म्हनलं… आदी दोन घास खाऊन घ्या…!!!”

“नाई… खान्यावरची वासनाच उडलीय बगं… येकदा का तोपा चढल्या बुरजावर मंग काय खरं नाई…!!!” किल्लेदाराच्या स्वरात काहीसा हताशपणा दिसून येत होता. जवळपास दोन वर्षांपासून कुणालाही गड उतरता आला नव्हता. खानाने दिलेला वेढा जराही ढिल्ला पडला नव्हता. किल्ल्यावर जमविलेली रसदही हळूहळू संपत होती. जास्तीत जास्त महिना दोन महिने पुरेल इतके धान्य अजूनही किल्ल्यावर होते पण खानाने बनविलेला हा लाकडाचा बुरुज किल्लेदारासाठी राक्षस बनला होता. त्याच वेळेस संभाजी महाराजांच्या पाच पाच मोहिमा चालू असल्यामुळे त्यांच्याकडूनही मदत आलेली नव्हती.

“तुमास्नी काय वाटलं… मला काय ह्ये ठावं नाय? पर आपल्याकडं समदे बघू ऱ्हायलेत. काय झालं तरी खानाला ह्यो किल्ला आसाच द्यायचा नाई.” शेवटचं वाक्य तिने त्वेषात उद्गारले. किल्लेदाराला पुन्हा एकदा आपल्या बायकोचा अभिमान वाटला.

पुन्हा एकदा किल्लेदाराने सगळ्या लोकांना बोलावले. आजची रणनीती नेहमीच्या रणनीती पेक्षा खूपच वेगळी होती. आज किल्लेदाराने तोफेच्या हल्ल्यात तटबंदीला खिंडार पडले तर कुणी कुठे थांबायचे आणि खानाच्या सैन्याला कापून काढायचे याची अगदी बारकाईने आखणी केली होती. आता प्रत्यक्ष लढाई होणार यात काही संशय उरला नव्हता. प्रत्येकाने आपले शीर हातावरच घेतले होते.

खानाने देखील सभा बोलावली. प्रत्येकाला त्यांची कामे आखून दिली. दोन दिवस तोफा बुरुजावर नेण्यास लागणार होते. त्यानंतरचे दोन दिवस फक्त त्या तोफांचा किल्ल्यावर मारा करून किल्ल्याचे आणि तेथील लोकांचे जितके शक्य होईल तितके नुकसान करायचे आणि नंतर एकदम हल्ला चढवायचा असा बेत नक्की करण्यात आला. ही आखणी चालू असतानाच एक दूत घाईघाईत तिथे येऊन हजर झाला.

“हुजूर… बादशा आलमगीर का आपके नाम संदेश आया है…” त्याने खानाला सांगितले.

“हां… उसे अंदर लेके आव…!” खानाने फर्मावले.

काही वेळातच बादशहाचा दूत खानासमोर हजर झाला. त्याने खानाला लवून कुर्निसात केला आणि आपल्या जवळील खलिता खानाच्या हाती दिला. खानाने तो आपल्या हाती घेत त्याला खुणेनेच जाण्याची आज्ञा दिली. सगळे जण बादशहाचा काय निरोप आहे हे ऐकायला उत्सुक झाले होते.

खानाने मनातल्या मनात खलिता वाचायला सुरुवात केली. सगळे जण अगदी टक लावून त्याच्याकडे पहात होते. खान जसजसा खलिता वाचत होता तसतसे त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. अगदी काही वेळापूर्वी अगदी खुशीत असलेला खान आता चांगलाच संतापलेला दिसत होता. त्याचा तो चेहरा पाहून सभेला उपस्थित असलेल्यांपैकी एकाचीही खानाला काही विचारण्याची हिंमत झाली नाही. खानही काही बोलत नव्हता आणि इतर कुणी काही विचारण्याची हिम्मत करत नव्हते. नक्कीच बादशहाकडून असा काहीतरी हुकुम आला होता ज्याने खानाचा अभिमान डिवचला गेला होता. शेवटी खानाचा आवाज शांततेचा भंग करीत वातावरणात घुमला.

“तुम सब जाव…!!!” काहीशा घुश्यात खानाचा आदेश आला आणि काहीही न बोलता प्रत्येकजण शामियान्यातून बाहेर पडला. आता मात्र खान चिडलेल्या वाघासारखा येरझाऱ्या घालत होता. आतापर्यंत कितीतरी वेळा त्याने खलिता वाचला होता आणि प्रत्येक वेळेस त्याचा संताप वाढतच होता. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी संतापाची भर ओसरली. तसेही चिडून संतापून घडणाऱ्या घटनेत काहीही फरक पडणार नव्हता. पुन्हा एकदा त्याने पहारेकऱ्याला आवाज दिला आणि परत सभा बोलावली.

काही वेळातच सर्वजण खानाच्या शामियान्यात हजर होते. एव्हाना खानाचा चेहरा बराच शांत झाला होता. आवश्यक ते सर्वजण जमल्याची खात्री झाल्यावर खानाने बोलायला सुरुवात केली.

“शहंशहा आलमगीरका फर्मान आया है… मुझे वापस आने का हुकुम मिला है पर अभी जंग खतम नही हुई. मेरी जगह फतेह खान लेगा…” खान बोलायचा थांबला. खलित्यातील सगळ्या गोष्टी सांगणे मात्र त्याने टाळले. त्याचे हे बोलणे चालू असतानाच बाहेर गलका वाढला. तेवढ्यात दारावरील पहारेकरी आत आला.

“क्या है? इतना शोर कैसा?” खानाने संतापून पहारेकऱ्याला विचारले.

“हुजूर… बाहर हवालदार आये है, आपसे मिलना चाहते है…” त्याने मान खाली घालून उत्तर दिले.

“ठीक है, भेजो अंदर…” खानाने फर्मावले. काही क्षणातच हवालदार खानापुढे हजर झाला.

“बोलो हवालदार…”

“हुजूर… एक बुरी खबर है…” त्याने काहीसे घाबरत सांगितले. आता आणखीन कोणती वाईट बातमी आली याचा खानाला विचार पडला. हवालदार मात्र मान खाली घालून फक्त उभा होता.

“रुक क्यो गये? बोलो…” खानाचा आवाज वातावरणात घुमला.

“हुजूर… हमने जो दमदमा बनाया है, उसे आग लग गयी… और वो पुरी तरहसे बरबाद हो गया है…” त्याने बिचकत बिचकत सांगितले.

“क्या? कैसे हुवा ये सब?” खान ओरडलाच.

“हुजूर… किलेपरसे एक गोला आया और…” त्याला पुढचे बोलण्याची गरजच पडली नाही. खान धावतच बाहेर आला. त्याच्या डोळ्यासमोर त्याची वर्षभराची मेहनत राख होताना दिसत होती. मुघल सैन्यात हाहाकार मजला. आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत होत्या. जवळपासचे कित्येक सैनिक आपला जीव वाचवीत दूर पळाले. कित्येक जण आगीत भाजून निघाले. दमदम्यापासून खानाचा शामियाना बराच दूर असून देखील त्यालाही त्या आगीची धग स्पष्ट जाणवत होती. खानाच्या डोळ्यात अंगार फुलला. खानाचा बराचसा दारुगोळा आगीत स्वाहा झाला. आणि त्याच वेळेस किल्लेदार मात्र तुका, सदू आणि त्याच्या साथीदारांना शाब्बासकी देत होता. आज खऱ्या अर्थाने किल्ल्यावर दिवाळी साजरी होत होती.

———————————-

जवळपास दोन दिवस दमदमा जळत होता. हळूहळू त्याची आग विझत होती तसाच खानाचा चढलेला पाराही ओसरत होता. त्याच्या मनातील संतापाची जागा असूयेने घेतली. बादशहाने केलेला त्याचा अपमान त्याच्या जिव्हारी लागला होता. त्याने घेतलेल्या संपूर्ण मेहनतीवर बादशहाच्या एका खलित्याने पाणी फिरवले. आता जो कुणी नवीन सरदार त्याची जागा घेणार होता त्याला परत पहिल्यापासून सगळी सुरुवात करावी लागणार होती. आणि हीच गोष्ट त्याच्या मनातील राग शांत करण्यास कारणीभूत ठरली.

नवीन येणाऱ्या सरदाराची वाटही न पाहता खानाने परतण्याची तयारी सुरु केली. या कालावधीत किल्ल्याचा वेढा काहीसा ढिल्ला पडला. खानाने आपले पूर्ण लक्ष काढून घेतले होते.

किल्ल्यावरून सैन्यात धावपळ दिसत होती पण त्यात कुठेही चैतन्याचा लवलेशही नव्हता. ही गोष्ट किल्लेदारासाठी काहीशी आश्चर्यकारक आणि काहीसी न उमजणारी होती. तो सैन्याच्या हालचालींकडे निरखून पाहू लागला आणि त्याच्या मनात एक विचार चमकला. क्षणाचाही विलंब न लावता त्याने सभा बोलावली.

“गड्यांनो… दोन दिसापासून खानाच्या सैन्यात लगबग दिसून ऱ्हायली. त्याचा मनसुबा तुमी समद्यांनी हानून पाडला. या दोन दिसांमधी त्याच्याकून कायबी उत्तर आलं नाई. त्याच्या तोपाबी थंडच हुत्या. पन आपल्याला बेसावध राहून चालायचं नाई. कारन अजूक त्यानं गडाचा वेढा उठीवला नाई. तवा दोन जनांनी रातच्याला जाऊन सैन्याची बातमी घिवून यायची हाये. काम लई जोखमीचं हाय… सैन्याच्या हाती गावले त जीत्ते परत यायचे नाईत. तुमच्या पैकी कोन ह्ये काम अंगावर घ्यायला तयार हायेत त्यांनी पुढं या…” किल्लेदार बोलायचे थांबला तसा जवळपास सगळीच माणसे पुढे सरकली. आपल्या लोकांच्या या कृतीचा किल्लेदाराला अभिमान वाटला.

“आरं समदेच गेलेतर मंग हितं कोन ऱ्हाईल?” किल्लेदार हसत म्हणाला आणि मग त्याने दोघांची निवड केली. दोघेही अगदीच किरकोळ शरीरयष्टीचे होते.

रात्रीच्या अंधारात दोन सावल्या गडावरून खाली उतरत होत्या. प्रत्येकाने अंगावर घोंगडी पांघरली होती. त्यामुळे रात्रीच्या कुट्ट अंधारात दोघेही हरवले होते. दोघांचेही डोळे जरी अंधाराला सरावले होते तरी त्यांना सावधगिरी बाळगावी लागत होती. एक चुकीचे पाऊल आणि समोर मृत्यू हे अधोरेखित होते. तसे दोघांपैकी कुणीही मृत्यूला घाबरणारा नव्हता पण त्यांचा मृत्यू हा किल्लेदारासाठी नुकसानदायक ठरणार होता. आणि याच एका कारणाने दोघेही अगदी काळजीपूर्वक हालचाल करत होते. एरवी एकदीड तासात पूर्ण गड उतरणारे ते शूर शिपाई आज मात्र प्रत्येक पाऊल आधी कानोसा घेऊन टाकत होते.

काही वेळातच त्यांना खानाच्या वेढ्यातील एक छावणी दिसू लागली. छावणीत एकूण सहा तंबू उभारण्यात आले होते. त्यातील फक्त एक तंबू काहीसा लहान आणि बाकी जरासे मोठे होते. लहान तंबूसमोर दोनजण पहारा देत होते. म्हणजेच तो एखाद्या अधिकाऱ्याचा असणार यात शंका नव्हती. मोठ्या तंबूसमोर मात्र एकेक जण दिसून येत होता. बहुतेक ते सैनिकांना आराम करण्यासाठी उभारण्यात आले होते. इतर पहारा देखील दिसत होता पण त्यांच्यात कोणतीही सावधगिरी दिसून येत नव्हती. तसेही यावेळेस गडावरील दोघांनाही देण्यात आलेले काम हे फक्त बातमी मिळविण्याचे होते. त्यामुळे पहारेकऱ्यांचा जिथपर्यंत आवाज येईल त्यापेक्षा पुढे जायचे नाही अशी सक्त ताकीद किल्लेदाराने दोघांनाही दिली होती.

काही वेळ गेला आणि पहाऱ्यावरील एकाने शेकोटी पेटवली. थंडीचा कडाका वाढतच होता त्यामुळे एकेक करून पहाऱ्यावरील शिपाई शेकोटीभोवती जमू लागला. तसेही इतकी मोठी फौज असताना कोणताही प्राणी जवळ येईल याची सुतराम शक्यता नव्हती.

हळूहळू शेकोटीने चांगलाच पेट घेतला आणि प्रत्येक शिपाई हात शेकून घेऊ लागला. हळूहळू त्यांच्यात बोलणे सुरु झाले. प्रत्येक शब्द दोघाही हेरांना स्पष्टपणे ऐकू येत होता.

“काय रे… सरदार कामून चिडले व्हते?” एका शिपायाने विषय काढला.

“अरे… लय मोठा किस्सा हाय त्यो…” दुसऱ्याने तोंड उघडले.

“किस्सा?”

“हां मंग…! आपला सरदार हाय नव्हं, त्याला बादशाचा हुकुम आला. परत बोलीवला हाय… आन निस्ता बोलीवला न्हाई तर लय श्या दिल्यात म्हने बादशाने खलीत्यात. सरदारानं त्यो काय कुणाला दावला बी नाई. आन आता चार सा दिवसात फतेखान येनार हाय.” त्या शिपायाने जितके माहित होते तितके सांगण्याचा प्रयत्न केला.

“ह्ये येक लैच चांगलं झालं बग…” पहिला शिपाई उद्गारला.

“काय चांगलं झालं?” तिसऱ्या शिपायाने मध्येच तोंड उघडले.

“आरं ह्यो सरदार… लय हरामी… आपल्या देखत आपल्या देवाचे मंदिर फोडले. माह्या मागं बायका पोरं नसती ना, त्याला तितंच आडवा केला असता…” पहिल्या शिपायाच्या बोलण्यात खानाबद्दलचा राग चांगलाच दिसून येत होता.

“ह्या ह्या ह्या… कायबी बोलून ऱ्हायला… तू कुटं, त्यो खान कुटं..!!! तुज्यासारखे उजूक धा गेलेना चालून त्याच्या अंगावर तर त्या समद्यांना पानी पाजन त्यो…” तिसऱ्या शिपायाने पहिल्या शिपायाची पूर्णतः खिल्ली उडवली.

“हां… त्ये बी खरं हाय म्हना… साला राक्षस हाय पुरता…” पहिल्या शिपायाने माघार घेतली.

“आरं… बाकी त्ये काय बी असू दे… पुढचे चार सा दिस आपल्याला आराम हाय… जवर नवीन सरदार येत नाई तवर काय घोर नाई बग…” चौथा शिपाई म्हणाला आणि सगळ्यांनी त्यावर होकारार्थी माना हलवल्या.

“म्या काय म्हनतो… देवानच सरदाराला अद्दल घडीवली असनार… तुमी देवाची मूर्ती फोडनार आन त्यो तुमाला यवस्थित ठिवनार व्हंय? आतापोतूर आपन सरदारासंग काय कमी लढायात भाग घ्येतला? कोनच्याच लढाईत हार झाली नाई. पन आज दोन वर्स झालं, येक पाऊल सुदिक पुढं पडून नाई ऱ्हायलं.” पाचव्या शिपायाने पहिल्यांदाच तोंड उघडले.

गडावरील दोघाही हेरांच्या चेहऱ्यावर एक आनंद फुलला. त्यांना किल्लेदाराने दिलेली कामगिरी अगदी सहजपणे पार पडली होती. अजून काही वेळ थांबून परतण्याचा दोघांनीही निर्णय घेतला.

पहाटेच्या वेळेला किल्ल्याच्या दरवाज्यावर खुणेचा आवाज आला आणि दरवाज्याची लहानशी झडप उघडून तिथे एक चेहरा दिसू लागला. खुणेचा आवाज म्हणून त्याने एक शिळ घातली आणि त्याला लगेचच प्रत्युत्तर मिळाले. क्षणाचाही विलंब न करता झडप बंद झाली आणि पुढच्याच क्षणाला किल्ल्याचा लहान दरवाजा उघडला गेला. कामगिरीवर गेलेले दोघेही जण त्यातून आत शिरले. काही पायऱ्या चढून ते वर आले तो त्यांच्या पुढे स्वतः किल्लेदार उभा होता.

“काय रे माह्या वाघांनो… काय खबर हाय?” त्याने अगदी बारकाईने दोघांच्याही चेहऱ्याकडे निरखून पाहत प्रश्न केला.

“किल्लेदार… देव आपल्याच बाजून हाय…” दोघांपैकी एकाने अगदी खुशीत उत्तर दिले आणि किल्लेदार खुश झाला. नंतर एकेक करत दोघांनीही पूर्ण बातमी किल्लेदाराला दिली आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.

“वा रं माह्या पठ्ठ्यांनो… लैच मोठं काम केलं हाये तुमी… जा आता उल्शिक आराम करा…” त्याने दोघांच्याही पाठीवर शाब्बासकीची थाप देत त्यांना आराम करायला पाठवले.

“किल्लेदार… आता तुमीबी आराम करा… दोन दिस झालं, तुमीबी काईच आराम केला नाई…” तात्या उत्तरला आणि ते खरेही होते. दोन दिवसांपासून रात्रीची झोप अशी किल्लेदाराला माहितीच नव्हती. त्यामुळे त्यानेही तात्याच्या बोलण्याला मान देत आपली पावले वाड्याकडे वळवली.

क्रमशः- झुंज भाग ७.

मिलिंद जोशी, नाशिक…

झुंज भाग १

झुंज भाग 6

झुंज भाग 8

Leave a comment